आपल्याकडे ऑक्टोबरमध्ये राष्ट्रकुल खेळांचे आयोजन होणार आहे. स्पर्धा अवघ्या २ महिन्यांवर आली असल्यामुळे साहजिकच जोरदार वातावरण निर्मिती चालू आहे. पण जे वातावरण तयार झाले आहे ते खेळांना आणि खेळाडूंना नक्कीच पोषक नाहीये. रोज नवीन वाद समोर येत आहेत, रोज भ्रष्टाचाराची नवीन घटना उघडकीस येत आहे. आपल्याकडे खेळ या सामान्य नामापुढे केवळ एकच विशेष नाम येते : क्रिकेट!!!. बाकीच्या खेळांकडे लक्ष दिले जात नाही किंवा बाकीच्या खेळांचा विकास होत नाही अशी पुंगी नेहमी वाजते. आता आपण बघूयात बाकीच्या खेळांमध्ये आणि क्रिकेट मध्ये एवढी दरी का निर्माण झाली आहे ते.
कोणत्याही खेळाचा विकास होण्यासाठी २ पातळ्यांवर काम करावे लागते. एक म्हणजे मैदानात चांगला खेळ करून सामान्य जनतेचे लक्ष खेळाकडे वेधून घेणे. तुम्ही सारखेच जिंकत राहिलात तर प्रसारमाध्यमे, क्रीडाप्रेमी यांचे लक्ष तुमच्याकडे जाणारच, त्यांना त्या खेळाची आवड निर्माण होणारच,
सातत्याने चांगली कामगिरी करून लक्ष वेधून घेतलेल्या काही खेळाडूंची नावे इथे मला नमूद करावीशी वाटतात - विश्वनाथन आनंद, साईना नेहवाल, लिएंडर पेस, महेश भूपती.
भारताला ऑलिम्पिकमध्ये आत्तापर्यंत ७ वैयक्तिक पदके मिळाली आहेत
खाशाबा जाधव (रौप्य, १९५२ हेलसिंकी)
लिएंडर पेस (कांस्य, १९९६ अटलांटा)
कर्नाम मल्लेश्वरी (कांस्य, २००० सिडनी)
राज्यवर्धन राठोड (रौप्य, २००४ अथेन्स)
अभिनव बिंद्रा (सुवर्ण, २००८ बीजिंग)
विजेंदर कुमार (कांस्य, २००८ बीजिंग)
सुशील कुमार(कांस्य, २००८ बीजिंग)
ऑलिम्पिक संपल्यावर यातील प्रत्येक खेळाडू हा केवळ सत्कार स्वीकारण्यात गुंतलेला दिसला. यशाची चव जरूर चाखावी पण धुंदी चढू नये. यातील एक तरी नाव (लिएंडर पेस सोडून) आपण पुन्हा ऐकले का? किंवा स्पर्धेच्या आधी ऐकलं होतं का? किती लोकांना राज्यवर्धन राठोडने पदक जिंकण्यापूर्वी "डबल ट्रॅप शूटिंग" नावाचा क्रीडा प्रकार माहित होता? मग आम्ही हे यश म्हणजे योगायोग समजावं का? (याचा अर्थ असा नाही की यश मिळवण्याची या खेळाडूंची लायकी नाही) आपल्याकडे स्पर्धा सुरु होण्यापूर्वी "पदक मिळवणारे संभाव्य खेळाडू" म्हणून कोणाचेच नाव पुढे येत नाही याचे कारण म्हणजे आपल्या खेळाडूंना आपली तयारी कितपत झाली आहे याचा अंदाज आलेला नसतो. त्यांच्याकडे स्वताच्या कामगिरीचे मोजमाप करण्याची कोणतीही यंत्रणा नसते, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा फारसा अनुभव नसतो. आता आपण मायकेल फेल्प्सचे उदाहरण पाहूयात - अथेन्स २००४ मध्ये त्याने स्पर्धा सुरु होण्यापूर्वी सांगितलं होतं की मी ८ प्रकारांमध्ये भाग घेणार असून सगळ्या प्रकारांमध्ये सुवर्ण पदक मिळवण्याचे उद्दिष्ट आहे. त्याला ६ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य पदक मिळाले. हे भाकीत करताना त्याला कल्पना होती की आपल्याला इयान थॉर्प आणि पीटर वॅन हुगेनबॅंड या दिग्गज खेळाडूंशी सामना करायचा आहे. हा आत्मविश्वास आपल्या खेळाडूंमध्ये कधी दिसणार? १ ऑलिम्पिक पदक मिळालं म्हणजे आपलं आयुष्य सार्थ झालं का? आज २० वर्ष झाली, जवळपास शतकांची शतके झाली तरी सचिन तेंडुलकर सारख्या खेळाडूंना देखील कधी कधी टीकेला सामोरे जावे लागते. हे सातत्य आपल्याला इतर खेळांमध्ये कधी दिसणार?
आता काही नावांचा वरती उल्लेख केला होता त्यांची कामगिरी पाहूयात
लिएंडर पेस (४३ दुहेरी विजेतेपद, १२ ग्रॅंड स्लॅम विजेतेपद, १२ ग्रॅंड स्लॅम उपविजेतेपद)
महेश भूपती (४५ दुहेरी विजेतेपद, ११ ग्रॅंड स्लॅम विजेतेपद, ११ ग्रॅंड स्लॅम उपविजेतेपद),
विश्वनाथन आनंद (३ वेळा वर्ल्ड चेस चॅम्पियन)
यांचा आदर्श बाकीचे खेळाडू कधी घेणार?
वरती आपल्याला जे काही प्रश्न पडले आहेत त्यांची उत्तरे शोधूयात. खेळाचा विकास करण्याची जबाबदारी ही एका पातळीवर खेळाडूंची तर दुसऱ्या पातळीवर त्या त्या क्रीडा संघटनांची असते, संघटनांनी खेळाला प्रोत्साहन देऊन खेळामध्ये पैसा कसा येईल आणि खेळाडूंना आर्थिक स्थैर्य कसे मिळेल या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असते. साहजिकच त्याचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होऊन ते अधिक चांगली तयारी व कामगिरी करू शकतील आणि आपण पहिल्या पातळीवर देखील यशस्वी होऊ. आपल्या राष्ट्रीय खेळ हॉकीची काय अवस्था आहे ते पाहूयात. के पी एस गिल नामक हिटलरच्या ताब्यात असलेल्या आणि गेले २ वर्ष वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या हॉकी इंडिया या संघटनेकडे खेळाडूंचे मानधन देण्याइतपत देखील निधी नव्हता, विश्वकरंडक डोळ्यासमोर ठेऊन खेळाडूंना संप करावा लागला तेंव्हा त्यांना त्यांचे पैसे मिळाले. यामधे संघटना, खेळाडू आणि आपला देश सगळ्यांचीच नाचक्की झाली. पुरुष हॉकीची ही कथा तर महिला हॉकी संघाचे कोच हे खेळाडूंचे लैंगिक शोषण करतात अशी बाब पुढे आली आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. आपल्या राष्ट्रीय खेळाच्या संघटनेची ही अवस्था तर बाकीच्या खेळांचे काय होणार ? अखिल भारतीय वेटलिफ्टिंग संघटनेला २ वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागले, कारण : खेळाडूंनी केलेले उत्तेजक द्रव्यांचे सेवन. अभिनव बिंद्रा आणि शूटिंग फेडरेशन मधला वाद चांगलाच गाजला, कारण : बिंद्राला संघटनेने, संघनिवडीपूर्वी पात्रता फेरीस सामोरे जाण्यास सांगितले आणि त्यामुळे त्याचा अपमान झाला!!! गगन नारंग नावाच्या शुटरने तर आता राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकायचे ठरवले आहे, कारण : राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी त्याची निवड झाली नाही !!! आपण देशासाठी खेळतो की पुरस्कारासाठी ?
भारतीय ऑलिम्पिक संघटनेविषयी तर रोजच नवीन वाद आपण ऐकत आहोत. एकीकडे क्रिकेट विश्वकरंडकाच्या स्टेडीयम नूतनीकरणासाठी ७०-८० कोटी खर्च येत असताना राष्ट्रकुलच्या स्टेडीयमचा खर्च ४००-८०० कोटीच्या घरात कसा गेला याचे पण नवलच आहे. आज क्रिकेटर्सना मिळणारा पैसा सगळ्यांच्या डोळ्यात खुपतो, पण त्यासाठी संघटना आणि खेळाडू यांनी दोन्ही पातळ्यांवर केलेले प्रयत्न कोणी विचारात घेत नाही. आपल्याकडे खेळाचे व्यावसायिकीकरण हे प्रथम IPL च्या रुपात पहावयास मिळाले. युरोप मधे फ़ुटबॉल (जसे इंग्लिश प्रीमियर लीग) आणि अमेरिकेमध्ये बास्केटबॉल (NBA) मधे हा प्रकार सुमारे १०० वर्षांपासून सुरु आहे. आज क्रिकेटसारख्या खेळात अनेक राजकारणी विविध संघटनांचे पदाधिकारी म्हणून सक्रीय आहेत, फक्त क्रिकेट खेळात त्यांना रस असण्याचे कारण म्हणजे इथे असलेला पैसा आणि ग्लॅमर. त्यांना खरंच खेळाचा विकास करायची इच्छा असेल तर त्यांनी प्रत्येक खेळ वाटून घेतला पाहिजे. नाहीतर क्रिकेट आणि इतर खेळांमधली दरी अजून वाढणार यात काहीच शंका नाही.
राष्ट्रकुलसारख्या स्पर्धेची तयारी करताना आपण वेळेत स्टेडीयम बांधू शकत नाही, बांधलेली स्टेडीयम निकृष्ट दर्जाची असतात, अनेक अधिकारी भ्रष्टाचारात अडकलेले आढळतात मग ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेचे आयोजन करण्याचे स्वप्न आम्ही सोडून द्यायचे का?
~अमेय